आरक्षणाने खुर्ची मिळते, पण ताकद मिळते का?
आज महिला सरपंच ‘डमी’ बनून राहिल्या आहेत. गावात जे पक्षीय खेळ सुरू असतात, त्यात त्या फक्त प्यादी बनतात. सत्ता मिळवण्यासाठी, विरोधकांना हरवण्यासाठी, योजनांच्या वाटपावर कब्जा ठेवण्यासाठी – बाईचा वापर केला जातो, आदर नाही. ती फक्त सही करणारी ठरते, ठाम बोलणारी नव्हे. तिच्या नजरेत गावाचा विकास असतो, पण हातात काहीही नसतं. सत्तेची ही खोटी संधी म्हणजे खऱ्या सशक्तीकरणाची विटंबना आहे.जेव्हा एक सामान्य ग्रामीण महिला सरपंच होते, तेव्हा गावकऱ्यांमध्ये अपेक्षा असते – की ती आपल्या सारख्यांची आहे, आपल्या घराची आहे, कष्टाची, माणुसकीची आहे. पण जेव्हा तिच्या नावावर दुसरे लोक सत्ता राबवतात, तेव्हा त्या अपेक्षांवर तुडवून जाण्याइतका मोठा विश्वासघात दुसरा नसतो, तिच्याशीही आणि लोकांशीही.
ही वेळ आहे – आरक्षणाला अर्थ द्यायची.
महिलांना ‘केवळ’ निवडून देण्यापेक्षा, त्यांना ‘खऱ्या अर्थाने निर्णयक्षम’ बनवायची.
"ती "च्या मताला मोल द्या,"ती "च्या स्वप्नांना पंख द्या."ती "च्या हाती खरोखरची सूत्रं द्या – कारण "ती" फक्त ‘सरपंच बाई’ नाही, "ती "गावाचं भविष्य आहे.
© अक्षय पाटील, सोनवडे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा