आज ६ जून...
हा कोणताही साधा दिवस नाही,
हा दिनांक फक्त दिनदर्शिकेतील एक पान नाही...
हा आहे तो दिवस,
ज्या दिवशी मातीने सिंह घडवला —
आणि त्या सिंहाने त्या मातीतच स्वराज्याचं बीज पेरलं!
आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन —
फक्त सिंहासनावर बसलेला एक राजा नव्हे,
तर जनतेच्या हक्काचं सामर्थ्य बनलेला ‘स्वराज्याचा शिल्पकार’.
त्या दिवशी रायगड फक्त किल्ला नव्हता... तो अख्खं मराठ्याचं स्वप्न होता!
गर्जना होत होत्या वेद मंत्रांच्या,
गर्जना होत होत्या वेद मंत्रांच्या,
ढोल-नगाऱ्यांचा नाद आसमंतात दुमदुमला होता.
पण... त्याहीपेक्षा प्रचंड आवाज होता,
जनतेच्या डोळ्यातून झरणाऱ्या अभिमानाच्या अश्रूंनी साकार झालेल्या त्या "राजा"चा!
"शिवाजी राजा झाला....
जिजाऊंच्या पोटी जन्मलेला तो शिवबा...
हजारो रात्र जागून एक आईने संस्कारांचं लेकरू घडवलं,
आणि एक दिवस त्या लेकरानं
मुघलांच्या महालांना हादरवून ‘स्वराज्य’ प्रस्थापित केलं!
शिवबा सिंहासनावर बसला, पण त्याच्या डोळ्यात अंहकार नव्हता...
त्याच्या मनात फक्त एक विचार होता – माझ्या माणसांसाठी, माझ्या मातीतून, माझ्या धर्मासाठी न्यायाचं राज्य उभं करणं.
हा राज्याभिषेक नव्हता, हा शपथविधी होता.
शपथ होती –
"मी राजा आहे, पण माझं राज्य हे प्रजेचं आहे...
मी सिंहासनावर बसलो असलो, तरी स्वराज्याचा पहिला सेवक आहे!"
असं बोलणारा राजा? नाही, तो केवळ राजा नव्हता…
तो होता जनतेच्या हक्कांसाठी तलवार उपसणारा संतराजा!
सत्तेच्या शिखरावर जाऊनही अभिमानाचा अणुकणही न दाखवणारा,
पण मावळ्याच्या घामाला राजसन्मान देणारा!
कोणत्या बादशहाने दिला असा त्याग?
कोणत्या सुलतानाच्या रक्तात होतं असं आत्मभान?
हा विचार फक्त आणि फक्त —
छत्रपती शिवाजी महाराजांचाच!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा