वेळेआधीचा पाऊस... आणि थांबलेली शेतकऱ्याची आशा?

   

                शाहूवाडी तालुका — निसर्गाच्या कुशीत विसावलेला, हिरव्यागार डोंगररांगांनी सजलेला, आणि वर्षानुवर्षे भातशेतीला ओलावा देणारा. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत येथे पावसाचं प्रमाण अधिक. त्यामुळे इथली मातीही खास – भातासाठी साजेशी, काळी आणि सुपीक.पावसाचे पहिले थेंब जिथे हळुवारपणे जमिनीवर पडतात, तिथे नुसतं पाणीच नव्हे, तर आशाही अंकुरते. पण यंदा पाऊस काहीसं वेगळंच गीत घेऊन आला आहे – सूरही वेगळा आणि तालही वेगळा.
               मे महिन्यातच ऐन पेरणीच्या वेळी पावसाने बळकट हजेरी लावली. जणू आभाळातून संयम सुटल्यासारखं वाटावं आणि काळजीचं धुकं शेतकऱ्याच्या मनावर उतरावं. या आधी जूनमध्ये येणाऱ्या पावसाच्या स्वागतासाठी शेतकरी सज्ज असायचा, पण यावेळी पावसाने वेळेआधीच "नमस्कार" केला आणि शेतकऱ्याच्या मनात प्रश्नांची वावटळ सुरू झाली.
"तयारी अपुरी, माती ओली, आणि मनात धाकधूक....."
भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी मे महिन्यातच सुरु व्हायची.यंदा मात्र पाऊस आधीच आला आणि पेरणीस सुरुवात करता आली नाही.अनेकांच्या मेहनतीची घडी विस्कटली, तर काहींनी तयारीच्या सुरुवातीलाच थांबावं लागलं.
           आता प्रश्न उभा राहतो – असाच पाऊस अजून काही दिवस सुरु झाला तर? कदाचित पेरणीचा टप्पा वगळून थेट रोपलावणीच करावी लागेल. या सगळ्यात मोठा प्रश्न शासन कितपत सोबत असेल.आजवर अनेकदा अनुभव आलाय – नैसर्गिक आपत्तीतून शेतकरी उभा राहतो आपल्या हिमतीवर, पण मदतीच्या नावाखाली फक्त फॉर्म भरून, आश्वासनं ऐकून थांबावं लागतं.कर्जमाफीचं सरळ गणित उद्योगपतींसाठी लागू होतं, पण शेतकऱ्यांसाठी मात्र ते अजूनही गुंतागुंतीचं समीकरण आहे.शेतकऱ्याचं आयुष्य हेच – काळजावर दगड ठेवून मातीशी नातं टिकवनं.
         शाहूवाडीचा शेतकरी आजही आपल्या मातीशी नातं सोडत नाही – कारण त्याला माहीत आहे, की संकटं येतात आणि जातात...पण आता केवळ निसर्गाशी नव्हे, तर शासनाशीही एक प्रामाणिक अपेक्षा आहे – "आम्हाला फक्त मदतीच्या जाहिराती नकोत, कृती हवीय.कारण भाताच्या रोपात केवळ धान्य नसतं, तर लाखो शेतकऱ्याची स्वप्नं रुजलेली असतात."
यावेळी पाऊस वेळेआधी आला, पण...
शासनाची मदत वेळेवर येईल का?
आज हवामान निसर्गानं बदललंय, पण आता शासनानेही धोरणं बदलून मदतीचा हात अधिक सढळपणे पुढे करायला हवा.

© 2025 अक्षय पाटील, सोनवडे, कोल्हापुर | दि.29 मे 2025



शहरातली जांभळं...., गावाची आठवण


                        आज सकाळी ऑफिसहून घरी जाताना, ठाणे (पश्चिम) रेल्वे स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला जांभळं विकणारी काही माणसं दिसली. तिथे जाऊन जमेल तसं भाव करत ५० रुपयांची जांभळं घेतली. घरी आल्यावर ती धुत असताना डोळ्यांसमोर एक वेगळीच दुनिया उभी राहिली – बालपणाची, गावाकडची, आणि त्या रानमेव्याची! रानमेवा हा लहानपणापासून माझ्या मनाच्या फार जवळचा विषय. त्याचं आकर्षण इतकं की, एखादं जाभळं,करवंदं बघितलं की आतून एक हुरहूर दाटून येते.अगदी लहानपणीची आठवण करून देते.

          आमच्या घराच्या बाजूलाच एक भलंमोठं जांभळाचं झाड होतं. एखाद्या सन्माननीय वृद्धासारखं ते झाड आमच्या बालपणीचं साक्षीदार होतं.मे महिना उजाडला की झाडावर काळसर-जांभळ्या रंगाचं सौंदर्य खुलायला लागायचं. वाऱ्याच्या झुळकीनं रात्रभर झाडाखालचं अंगण जांभळांनी सजलेलं असायचं. सकाळी उठल्यावर चहापेक्षा आधी आमचं लक्ष असायचं त्या झाडाकडे "आज किती जांभळं पडली असतील?" हा प्रश्नच आमच्या सकाळी उत्सुकतेचा भाग व्हायचा. आम्ही भावंडं, मिळून स्पर्धा लावायचो . कुणाला किती गोड आणि किती मोठी जांभळं मिळतात. एकेका जांभळासाठी किती धावाधाव, कधी हसणं, कधी किरकिर, तर कधी कधी एकमेकांच्या पिशवीमधून चोरून जांभळं काढण्याची गंमत!

              लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत निकाल लागला की माझं मामाच्या गावाला – पिशवीला – जाणं फिक्स असायचं. पिशवीला लागूनच डोंगर, समृद्ध वृक्ष संपदा होती, आणि त्यामुळे करवंदं आणि जांभळांची रेलचेल असायची.भावंडांच्या सहवासात त्या रानमेव्याचा स्वाद वेगळाच लागायचा. झाडावर चढून करवंदं तोडायची, किंवा रानात भटकत भटकत गोडसर जांभळं सापडली की त्यावर तुटून पडायचो. खऱ्या अर्थानं मे महिन्याच्या सुट्ट्या त्या चवीनीच गोड व्हायच्या.
              तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं की एक दिवस ते जांभळाचं झाडच राहणार नाही.वर्षानुवर्षं गेली… त्या झाडाखाली खेळणारी पिढी मोठी झाली....आणि त्या आठवणींना एक हळवी किनार लागली.
               मुंबईसारख्या शहरात जांभळं विकत घेऊन खावी लागतात – पण त्यात गावासारखा गोडवा कधीच सापडत नाही. कारण त्या जांभळांमध्ये आमच्या बालपणीच्या खेळाचा, श्रमाचा, आणि आनंदाचा स्वाद मिसळलेला असायचा.आज जांभळं बघून मन भरून आलं.गाव सोडलं... झाड गेलं... पण त्या झाडाखालील लहान मुले अजूनही मनात कुठेतरी धावत असतात. जांभळं वेचण्यासाठी... आणि आठवणींना जपण्यासाठी....

© अक्षय पाटील, सोनवडे | दि.२३ मे २०२५

ऑपरेशन सिंदूर – एका अश्रूंच्या सागरातून उसळलेली आग

ऑपरेशन सिंदूर – एका अश्रूंच्या सागरातून उसळलेली आग


       पहेलगाव... जिथे सकाळचं सूर्योदय न दिसता, काळोखाचं भेसूर रूप पहाटेच दाटून आलं. जिथे मायेच्या कुशीत असणाऱ्या लेकरांच्या गालांवर हास्य नव्हतं, तर भीतीचा थरकाप होता. जिथे एकाच क्षणात घरांतील स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्रं ओझं बनली.अखंड भारतवासियांना त्या दिवशी दुःखाच्या सावलीत उभं राहावं लागलं.

      तो हल्ला केवळ बंदुकांचा नव्हता तर तो हल्ला होता संपूर्ण भारतमातेच्या सत्त्वावर !पण भारत झुकत नाही... भारत क्षमा करतो, पण विसरत नाही! त्या अश्रूंनी जेव्हा राष्ट्राच्या काळजाला चिरलं, तेव्हा भारताने आपल्या संयमाच्या सीमांना मागे टाकत प्रतिशोधाचा रणसंग्राम छेडला — ऑपरेशन सिंदूर!

          ही  केवळ लष्करी कारवाई नव्हती, हा शपथविधी होता.ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ शत्रूला प्रत्युत्तर नव्हे, तर त्या प्रत्येक सतीच्या शापाला उत्तर होतं. त्या फुटलेल्या मंगळसूत्रांचं, भिरभिरणाऱ्या नजरेच्या लेकरांचं, आणि मातृत्वाच्या चिरडलेल्या हुंदक्यांचं प्रतिघोष होता – हा प्रतिशोध नव्हे, हा न्याय होता!

"तुम्ही आमचं कुंकू पुसलं, आम्ही तुमचा गर्व उद्ध्वस्त केला!" या धाडसी कारवाईने दहशतवाद्यांच्या छातीत भयाचं वादळ उठवलं, तर देशवासीयांच्या रक्तात पुन्हा आत्मसन्मान, अभिमान उसळून आला.

            आज आपली जबाबदारी आहे – जागृत राहणं, एकदिलाने उभं राहणं, आणि आपल्या सैनिकांचा सन्मान करणं.कारण जे सैनिक सीमेवर झगडतात, त्यांच्या पाठिशी उभं राहणं, हेच खरं देशप्रेम. "कुंकवासाठी चाललेलं हे युद्ध, प्रत्येक भारतीयाच्या मनात भारतमातेचं कुंकू जपण्यासाठीचं आहे."

शब्द संपतील, पण शौर्याचं स्मरण कधीच संपणार नाही.

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १० मे २०२५

अचानक विरलेली मायाळू सावली – मावशी

 🌿 अचानक विरलेली मायाळू सावली – मावशी 🌿

      कधी कधी आयुष्य अचानक थांबल्यासारखं वाटतं… एक क्षण असतो, आणि सगळं उलथून जातं.

             परवा एक बातमी अशी आली की काळजावर खोल जखम करत गेली — आमची मोठी मावशी, घरातली, नात्यातली एक ऊबदार सावली,अचानकच आमच्यातून निघून गेली.ती गेली… आणि आयुष्य थोडंसं स्तब्ध झालं.जणू काळाने थोडावेळ थांबावं, असं काहीसं क्षणभर वाटून गेलं. ती नेहमीसारखीच होती — हसरी, प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारी. आणि एक दिवस अचानक… ती नाहीशी झाली. शब्दांत न मावणारी पोकळी निर्माण करून आयुष्याच्या धावपळीतला एक Permanent आधार अचानक निखळला.

         मावशी केवळ नात्याने मावशी नव्हती, ती आमच्यासाठी दुसरी आई होती.लहानपणापासून तिचं प्रेम, तिचं हसणं, प्रत्येक सणात तिचा गोड आवाज — सगळं सगळं आठवतंय.आणि आता या आठवणींच्या गर्दीत एक सल मनात घर करून बसली आहे..

              मावशीचं एक ऑपरेशन होणार होतं. ते झाल्यावर मी तिला भेटायला गावी जायचं ठरवलं होतं — दोन दिवसासाठी तरी.माझ्याही मनात काही शंका नव्हती, वाटलं,साधं ऑपरेशनच तर आहे, होऊन जाईल नीट.शनिवारची सुट्टी होती, पण कुठंतरी कंटाळा आला, विचार केला ऑपरेशन झालं की पुढच्या शनिवार, रविवार गावी जाऊन मावशीला भेटायचं. आज त्या क्षणाची आठवण येते तेव्हा काळजावर ओझं येतं .गेलो असतो, तर शेवटचं पाहता आलं असतं… एखादा शब्द, एखादं हास्य, एक साश्रु मिठी… ती क्षणभराची भेट आयुष्यभर पुरली असती. पण तो क्षण निसटून गेला, कायमचा.भेटीपासून मी स्वतःलाच वंचित ठेवलं. ही सल — ही जन्मभर लक्षात राहणारी, बोचणारी गोष्ट बनून गेली आहे. माफ कर, मावशी मला शेवटच्या क्षणी तुझ्या सोबत न राहता येणं ही माझी चूक होती… पण मनापासून सांगतो, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही.

            आयुष्यात आपण किती गोष्टी "नंतर बघू", "उद्या करू" म्हणत टाळतो. पण मृत्यू कुठलाही अलार्म लावून येत नाही… तो येतो अचानक आणि आपण उभे राहतो पोकळपणे त्या क्षणासमोर.माणूस गेल्यावर त्याच्या आठवणी उरतात, आणि त्या आठवणींच्या मागे आपण कित्येक "काय झालं असतं जर..." असे प्रश्न घेऊन जगत राहतो.

        मावशीची उणीव शब्दांत मावळणारी नाही. ती नसणं आज घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवतं. पण तिचं प्रेम, तिच्या आवाजातली माया, तिचा काळजीचा सूर, तिचं विचारणं — “तू आणि सुषमा चांगलं आहेसा का रे?” हे सगळं आठवलं, की डोळ्यांच्या कडा ओलावतात. हे सगळं कायमच्या आठवणीत साठवून ठेवलंय. आम्ही सगळे अजूनही तिच्या आठवणींमध्ये हरवलेले आहोत. तिचं असणं आमच्यासाठी आशीर्वाद होतं, एक हक्काच सपोर्ट सिस्टीम होती आणि तिचं जाणं — जे कधीच भरून निघणार नाही.

                मावशी, तू गेलीस… पण तुझ्या आठवणींनी, तुझ्या मायाळू आवाजाने, प्रेमळ साध्या स्वभावाने आणि प्रत्येक वेळेस पाठीशी उभं राहण्याच्या तुझ्या सवयीने एक अमिट ठसा सोडून गेलीस. आमच्या गावच्या यात्रेत तुझं शेवटचं हास्य, शेवटचं बोलणं… आता फक्त आठवणींच्या धाग्यांत गुंफावं लागणार.कधी भेट होईल का पुन्हा, माहित नाही… पण एक मात्र नक्की — तुझी आठवण रोज मनाच्या पानांवर अलगद उतरते… आणि डोळ्यांच्या कडांवर थांबून राहते.

💐 श्रद्धांजली मावशी… तुझं प्रेम, तुझा आशीर्वाद, कायम आमच्या सोबत राहील…

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. ७ मे २०२५

१ मे — महाराष्ट्र दिन



ही केवळ एक दिनांक नाही,

ही आहे अस्मितेची आठवण, 

गर्वाची जाणीव, आणि आपल्या मराठी मातीतल्या माणसांच्या शौर्याची बलिदानाची साक्ष !

"दिल्लीचे ही तक्त राखी" – ही ओळ उच्चारली की काळजाच्या खोल तळातून एक आवाज येतो,

"हो! हा महाराष्ट्र माझा आहे!"

हा तोच महाराष्ट्र आहे...ज्याने आदिलशाही, मुघलशाही, इंग्रजशाही झुगारून 'स्वराज्य' उभारलं.

ज्याने शत्रूंच्या सिंहासनाला हादरवलं, आणि न्यायाचं राज्य उभारलं.

जिथं तलवारीच्या टवटवीत धारेत इतिहास कोरला गेला,आणि गडकोटांवर स्वराज्याची पताका फडफडली.

जिथं बाळ गंगाधर टिळकांची असंतोषाची ठिणगी पेटली आणि लोकमान्य झाले.

जिथं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय, समता, आणि शिक्षणाचा मशाल पेटवला.

पण या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठीही एक संघर्ष होता,एक आंदोलन होतं,आणि १०७ हुतात्म्यांचं रक्त सांडलं होतं!हो, आजचा हा महाराष्ट्र १०७ हुतात्म्यांच्या बलिदानावर उभा आहे.ते लढले, कारण त्यांना हवी होती एक भाषा, एक संस्कृती, एक ओळख –

"मराठी माणसाचा महाराष्ट्र!"

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळावा म्हणून रस्त्यावर उतरलेले हे वीरगोळ्यांच्या वर्षावातही मागे हटले नाहीत.त्यांच्या रक्तानं या मातीला पवित्र केलं…आणि म्हणूनच आज आपण अभिमानाने म्हणतो –

"हा महाराष्ट्र माझा आहे!" 

आजचा दिवस केवळ साजरा करण्याचा नाही,तर ते बलिदान आठवून, नवा महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करण्याचा आहे.शपथ घेण्याचा दिवस आहे,की हा महाराष्ट्र आपण तसाच राखू, जसा छत्रपतींनी घडवला, आणि शहिदांनी जपला!

जय महाराष्ट्र!

शिवरायांचा अभिमान – महाराष्ट्र!

 © अक्षय पाटील, सोनवडे | दि. १ मे २०२५

श्रमाचा सन्मान हवाच!

आज कामगार दिन आहे. सरकारी कार्यालयांमध्ये, सार्वजनिक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे हक्क, सुविधा आणि सामाजिक सुरक्षा मिळते. त्यांची नोकरी शाश्वत असते, त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, पगारवाढ, सुट्ट्या – हे सर्व काही ठरलेले आणि खात्रीशीर असते. पण या सुरक्षित व्यवस्थेच्या बाहेर, एक मोठा वर्ग आहे – खाजगी व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा.

हे कामगार कोण आहेत?

हे आहेत बांधकाम मजूर, फॅक्टरीतील कंत्राटी कर्मचारी, रस्त्यावर काम करणारे सफाई कामगार, सुरक्षारक्षक, हॉटेल-रेस्टॉरंटमधील वेटर्स, टेक्स्टाइल मिल्समध्ये काम करणारे लोक, ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉयज, घरकाम करणाऱ्या महिला… या सर्वांना आपण ‘कामगार’ म्हणतो, पण त्यांच्या कष्टांचा मोबदला मात्र किती अपुरा असतो!

कामाच्या तासांचा विचार केला तर…

बरेच खाजगी कर्मचारी दिवसाचे १२-१३ तास काम करतात. आठवड्याला एकही सुट्टी मिळत नाही. ओव्हरटाइमचे पैसे दिले जात नाहीत. पगार वेळेवर मिळत नाही, आणि मिळालाच, तरी तो कायदेशीर किमान वेतनाच्या ही खाली असतो. आणि आजारी पडले किंवा कामावरून काढून टाकले, तर त्यांना कोणताही हक्क राहत नाही.

सोशल सेक्युरिटी कुठे आहे?

अनेक ठिकाणी आजही कामगारांना पीएफ, ईएसआय, बोनस, पगार स्लिपसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत. काहींना तर आपली नोकरी कधी संपेल याचीही कल्पना नसते – कारण कोणताही कागदोपत्री करार होत नाही.

मानवतेला भिडणारी एक गोष्ट म्हणजे…

या कामगारांना "मशीन" समजून घेतले जाते. भावना, गरजा, घरातील जबाबदाऱ्या – यांचा विचार न करता त्यांच्याकडून "उत्पादन" घेतले जाते. त्यांच्या पाठीमागे ना युनियन असते, ना आधार. जेव्हा एखादा मजूर कामावरून काढला जातो, तेव्हा तो केवळ एक व्यक्ती नव्हे, तर एका कुटुंबाचा उदरनिर्वाह संपतो.

म्हणूनच आजच्या दिवशी…

केवळ सेलिब्रेशन नव्हे, तर आत्मपरीक्षण हवे.खाजगी व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्थिरता, सुरक्षितता, आणि मानवतेने भरलेले व्यवहार आवश्यक आहेत.

कामगार हा केवळ एक 'हात' नव्हे, तो एक 'हृदय' आहे – भावना असलेली, स्वप्ने पाहणारी माणसे. त्यांच्यासाठी आपल्या धोरणात, व्यवस्थेत आणि समाजाच्या दृष्टिकोनात बदल हवा.

कारण श्रमाचा सन्मान झाला,तरच खऱ्या अर्थाने कामगार दिन साजरा झाला म्हणता येईल.

© अक्षय पाटील, सोनवडे | दि. १ मे २०२५